पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-संगमनेर तालुक्यातील पठार भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता बिबट्यांचे दर्शनही जोडीने होवू लागल्याने संपूर्ण पठारभागात दुहेरी भितीचे दृष्य दिसत आहे.

नागरिकांच्या मनात सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी घारगाव पोलीस आपल्या परिने कर्तव्य बजावत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि,

घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस काँस्टेबल किशोर लाड व चालक नामदेव बिरे हे दोघे सरकारी वाहनातून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित गस्त घालत होते.

गेल्या काही दिवसांपासून पठारभागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे, यामुळे पोलीस पथक गस्त घालत होते. दरम्यान वरील दोघेही कर्मचारी पुन्हा घारगावच्या दिशेने निघाले.

वाटेत लागलेल्या खंदरमाळ शिवारात पोलिसांचे वाहन येताच चालक बिरे यांनी अचानक गाडीचे ब्रेक लावले. कारण त्यांना समोर दोन बिबटे दिसून आले.

त्यांनी तातडीने गाडीचे सायरन वाजविले व आवाज ऐकताच भररस्त्यात रेंगाळणारे ते दोन्ही बिबटे दोन टप्पे मारीत बाजूच्या झुडपात अदृष्य झाले. दरम्यान बाजूच्या शेतामध्ये शेतकरी पिकाला पाणी देत असल्याचे त्यांना समजले.

त्यामुळे त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत घारगावकडे जाणारे आपले वाहन खंदरमाळ शिवारातील वाडीवस्त्यांवर फिरवून सायरनद्वारे नागरिकांना सावध करण्याचे काम केले.

पोलीस वाहनाच्या सायरनमुळे नागरिक जागे होण्यासोबतच ते दोन्ही बिबटे दूर निघून गेल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. या दोन्ही कर्मचार्‍यांच्या समर्पित सेवेबद्दल खंदरमाळच्या ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News