अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या ! ताक-उसाचा रस पिताना सावधान तुमचं आरोग्य धोक्यात ?

नगर शहरात थंड पेयांची विक्री वाढली, पण नमुन्यांची तपासणी नाही; बर्फ, पाणी, फळांतील रसायनांचा कुणीही विचार करत नाही!

Published on -

उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय आणि थंड पेयांची मागणीही जोरात वाढलीय. ताक आणि उसाच्या रसाला तर नागरिकांची विशेष पसंती आहे. रस्त्यावरच्या हातगाड्यांवर लोकांची झुंबड उडताना दिसते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण घशाला थंडावा देण्यासाठी जी थंड पेयं पितोय, त्यांची कसलीच तपासणी होत नाहीये.

अन्न प्रशासन तर जणू कुंभकर्णासारखी गाढ झोप घेतंय. या कार्यालयाने आजवर एकाही थंड पेयाचा नमुना तपासणीसाठी उचललेला नाही. त्यामुळे नगरकरांनो, आता आपलं आरोग्य आपणच जपायची वेळ आली आहे.

मागच्या दोन आठवड्यांपासून ऊन चांगलंच चढलंय आणि पुढच्या महिन्यात तर ते आणखी वाढणार आहे. उष्म्याने घसा कोरडा पडतो आणि तहान लागते. अशा वेळी आपले पाय आपोआप थंड पेयांच्या दुकानांकडे वळतात. ही गरज ओळखून शहरात ठिकठिकाणी थंड पेयांचे स्टॉल्स उभे राहिले आहेत.

दिल्लीगेट, नेप्तीनाका, माळीवाडा, पुणे रोड, तारकपूर, मनमाड रोड, प्रोफेसर चौक, भिस्तबाग, एकवीरा चौक, तपोवन रोड अशा सगळ्या भागांत थंड पेयांची विक्री जोरात सुरू आहे. लोकांना तहान भागवायची आहे आणि विक्रेत्यांना कमाई करायची आहे.

पण या सगळ्या गर्दीत एक प्रश्न उरतोच – आपण पित असलेली ही थंड पेयं खरंच सुरक्षित आहेत का? रस्त्यावर हातगाड्यांवर ताक १५ ते २० रुपयांना ग्लास मिळतं. खारं आणि गोड अशा दोन्ही प्रकारांत ते उपलब्ध आहे. उसाचा रसही तितकाच लोकप्रिय आहे.

पण या पेयांमध्ये वापरलं जाणारं पाणी, बर्फ किंवा इतर गोष्टी स्वच्छ आहेत की नाही, याकडे कोणाचं लक्ष नाही. थंड पेयांसाठी बर्फ तर लागतोच, पण हा बर्फ एमआयडीसीतल्या कारखान्यांतून येतो. तिथे बनणारा बर्फ कितपत शुद्ध आहे, याचीही तपासणी होत नाही. मग आपण पितोय तरी काय, हा प्रश्न पडतोच.

दुसरीकडे, फळांबाबतही सावध राहण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी बुन्हाणनगरमध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण विषबाधा असावं, अशी चर्चा आहे. वैद्यकीय अहवाल आल्यावर खरं कारण समजेल,

पण सध्या बाजारात आंबे, कलिंगड, केळी यांसारखी फळं मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पण ही फळं पिकवण्यासाठी इंजेक्शन आणि औषधांचा वापर होतोय, हेही वास्तव आहे. विशेषतः कलिंगड पिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या याआधीही आल्या आहेत. मग ही फळं खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन आपण आपल्या आरोग्याशी खेळत तर नाही ना?

सगळं काही बाजारात मिळतंय, पण त्याची गुणवत्ता कोण तपासणार ? अन्न प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. थंड पेयांचे नमुने तपासले गेले नाहीत, बर्फाच्या कारखान्यांची चौकशी झाली नाही आणि फळांच्या गुणवत्तेकडेही लक्ष दिलं जात नाही.

अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःहून सावध राहणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात तहान लागणारच, पण ती भागवताना आपण काय पितोय, याचा विचार करायला हवा. नाहीतर अन्न प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe