Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथील डोंगराला शनिवार दि.१० रोजी रात्री लागलेल्या वनव्यामुळे मोठे क्षेत्र जळून खाक झाले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच वनवा लागण्याच्या घटना घडू लागल्याने जाळरेषा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर येथील महादेव खोरी तसेच कवडा डोंगर या परिसरात रात्रीच्या सुमारास वनवा लागला होता. सव्र्व्हे नंबर ८५० मधील वन विभागाचे सुमारे तीन हेक्टर तर खाजगी १५ हेक्टर क्षेत्र वनव्यात जळून खाक झाले आहे.
वनव्यामुळे परिसरातील मोठी वनसंपदा जळून खाक झाली आहे. पशुपक्षी, सरपटणारे प्राणी तसेच वन्य प्राणी जिवाच्या आकांताने सैरा वैरा धावत होते. नगर तालुक्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र वनविभागाचे आहे.
चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच डोंगरातील गवत वाळले आहे. त्यामुळे वनवा लागण्याच्या घटना वाढणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे वनविभागाच्या वतीने जाळरेषा तयार करण्यात येण्याची मागणी केली जात आहे.