अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- आपली विवाहित मुलगी व नातू बेपत्ता झाले आहे. पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर तपास लावावा या मागणीसाठी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडला आहे. दरम्यान लेकीसाठी उपोषणास बसलेल्या या पीडित आईच्या मदतीसाठी भारिप बहुजन संघ व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी पुढाकार घेतला आहे.

याबाबत बेपत्ता विवाहित मुलीची आई केशरबाई पवार यांनी नेवासा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून माझी मुलगी सिंधूबाई भागवत बोरसे व नातू कानिफनाथ हे दोघे मायलेक पाचेगाव येथून बेपत्ता झाले असून त्यांचे अपहरण झाले की त्यांना कोणी पळवून तर नेले नाही ना असा संशय मला वाटतो.
मी तीन महिन्यांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्याला मुलगी व नातू बेपत्ता झाले असल्याची खबर दिली होती. याबाबत गुन्हाही दाखल आहे. मात्र पोलिसांनी कुठलाच खुलासा केला नसल्याचे तसेच काहीच निष्पन्न झाले नसल्याचे उपोषणकर्त्या केशरबाई पवार यांचे म्हणणे होते. तरी माझ्या बेपत्ता मुलीचा व नातवाचा तपास पोलिसांनी लावावा.
अन्यथा होणार्या परिणामाची सर्व जबाबदारी शासनावर राहील असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. शेवटी आश्वासनंतर आम्ही उपोषण स्थगित करत असून बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हरीश चक्रनारायण यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved