Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे.
विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर महाविकास आघाडी १८० जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो. अशा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढाव्या संदर्भातील महत्त्वाची बैठक टिळक भवन येथील दादरच्या प्रदेश कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते .
या बैठकीत उत्तरेतील संगमनेर, राहता, श्रीरामपूर यासह दक्षिणेतील नगर शहराच्या जागेवर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी प्रदेश नेत्यांसमोर ही जागा कोणत्याही परिस्थितीत पक्षाकडे देत किरण काळे यांना उमेदवारी द्यावी यासाठी जोरदार आग्रह धरला. यासह श्रीगोंदा, कोपरगाव, अकोला हेही मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी केली.
यावेळी बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणूगोपाल, राष्ट्रिय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आ. नाना पाटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना वाघ, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नगर शहरासह जिल्ह्याच्या एकूण राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा मांडला.
बैठकीनंतर माहिती देताना जयंत वाघ म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेस अत्यंत बळकट आहे. दोन्ही खासदारांच्या विजयात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.
जिल्ह्यात काँग्रेसचा खासदारकीला एकही उमेदवार नसला तरी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार करण्यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले आहे .