डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेमध्ये झपाट्याने बदल होत आहे. पत्रकारांना डिजिटल मीडियाचे ज्ञान आत्मसात करुन प्रवाहात टिकता येणार आहे व शिकून पुढे जाता येणार आहे. एआय मेटा पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. मात्र तो ग्राउंड लेव्हलची बातमी देऊ शकणार नाही. पारंपारिक पत्रकारिता डिजिटल युगात बदलत असताना मोबाईलवर वाचकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा डिजिटल माध्यम तज्ञ संतोष धायबर यांनी केले.
अहिल्यानगर येथील पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी डिजिटल मीडिया आणि आजची पत्रकारिता या विषयावर व्याख्यानात धायबर बोलत होते. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार रामदास ढमाले, अशोक सोनवणे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, वृत्तछायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व यूट्यूब चैनलचे पत्रकार उपस्थित होते.

पुढे धायबर म्हणाले की, डिजिटल मीडिया हे पर्यायी माध्यम आहे. मात्र या माध्यमातून दर्जेदार व विश्वासार्ह मजकुर आवश्यक आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी हे भान जपायला हवे. नुकतेच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुक डिजिटल मीडियानेच हॅक केलेल्या होत्या. ऑनलाइन मीडियाने सेकंदात जगभरात बातमी पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच धायबर यांनी प्रिंट मीडियातून डिजिटल मीडियाकडे झालेला स्वतःचा यशस्वी प्रवास उलगडला. ते म्हणाले वेबसाईटवर दिलेले विषय कंटेंट चांगले असेल तर त्याला वाचक संख्या चांगली मिळते. मात्र त्यात सातत्या असले पाहिजे. युट्युबवर चांगले विषय असतील तर व्हिडिओ पाहिले जातात आणि गुगलकडून देखील त्याचा मोबदला दिला जातो.
मोबाईल सोबत प्रिंट मीडियाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तर डिजिटल मीडियात टिकून राहण्याचे तंत्र सांगितले.
सुभाष गुंदेचा यांनी पत्रकारांनी एकसंघ राहण्याचे आवाहन केले. पत्रकारिता बदलली आहे. पत्रकारितेची किंमत वाढवा व एकमेकांना कमी लेखू नका, जुने मूल्य जतन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पत्रकार संदीप कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सूर्यकांत नेटके यांनी करून दिला. ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी आभार मानले.