Maharashtra Kesari अंतिम सामन्यात पण वाद ? गायकवाडने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सोडले मैदान…

Ahmednagarlive24
Published:

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला, मात्र हा सामना एका वादग्रस्त वळणावर जाऊन पोहोचला.

महेंद्र गायकवाडने मैदान सोडले

सामना अतिशय चुरशीचा झाला. पृथ्वीराज मोहोळने पहिला गुण पटकावत आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्र गायकवाडनेही एक गुण मिळवत बरोबरी साधली. पण निर्णायक क्षणी पंचांनी पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण बहाल केला, ज्यावर गायकवाडने तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्याच्या मते हा गुण चुकीच्या पद्धतीने देण्यात आला होता. न्याय मिळावा म्हणून पंचांशी चर्चा करत असतानाच, गायकवाडने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंचांनी नियमांनुसार पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले.

प्रेक्षकांमध्ये गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप

या सामन्यादरम्यान, काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत आवाज उठवला. मात्र, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

भव्य बक्षीस वितरण सोहळा

विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळला चांदीची गदा आणि थार गाडी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या विजयाने पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे कुस्तीप्रेमींच्या मनात त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe