खासदार डॉ. सुजय विखे यांच्या त्या घोषणेमुळे उडाली खळबळ !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-  कोट्यवधी रुपये खर्च करून राहुरीचा डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत सुरू नाही. नैसर्गिक गोष्टी असत्या, तर आपण ते मान्य केले असते. परंतु बाॅयलरमध्ये जेव्हा साखर आणि पाणी दिसते.

तेव्हा मानवनिर्मित हलगर्जीपणा आहे. यास जबाबदार आहे. कोणाला तरी हा कारखाना चालू नये, असे वाटते. त्यामुळे पुढील ७२ तास नैसर्गिक आपत्ती वगळता जर हा कारखाना सुरळीत चालला नाही,

तर पत्रकार परिषद घेऊन कारखान्याचे नेते खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील तनपुरे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ राजीनामा देतील, असा इशारा संचालक मंडळ, अधिकारी व कामगार यांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी देण्यात आला.

शनिवारी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. यात त्यांनी कारखान्याची सद्यस्थिती व ती सुरळीत करण्यासाठी विचारविनिमय केला. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी आठ ते दहा कोटींचा खर्च झाला. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टनांवरून ४२५० टनांपर्यंत वाढली. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन ६४ दिवस झाले.

या कालावधीत फक्त पंधरा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील दहा लाख मेट्रिक टनांपैकी सहा लाख मेट्रिक टनाची नोंद झालेली आहे. ६४ दिवसांत सलग २४ तास कारखान्याचा गळीत चालू राहिले, असे एकही दिवस झालेले नाही. खासदार विखे म्हणाले, कारखाना सुरळीत चालत नसल्याने गळिताचा प्रश्न गंभीर झाला.

कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्ता ढूस, कारखान्याचे संचालक, अधिकारी, कामगार यांच्यासमवेत संयुक्त बैठक झाली. गेल्या साडेचार वर्षांपासून तनपुरे कारखाना सुरळीत चालावा यासाठी मी आणि संचालक मंडळ आणि कामगारांनी प्रयत्न केले.

गेल्या दोन महिन्यांपासून हा कारखाना सुरू राहावा, वेळेवर गाळप व्हावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न केले. परंतु अनेक अडचणी येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही कारखाना होऊ शकत नाही, याबद्दल खेद वाटतो. हा कारखाना सुरळीत चालू नये, अशा काही शक्ती कार्यरत आहेत.

त्यामुळे मानवनिर्मित दोष कारखान्यात आढळून येत आहेत. पुढील ७२ तासांत जर सुरळीत कारखाना सुरू झाला नाही, तर आम्हाला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. संचालक मंडळाच्या या घोषणेमुळे खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!