नुकसानग्रस्तांना महिना अखेर पर्यंत भरपाई दिली जाणार – खा. विखे

Published on -

टाकळी ढोकेश्वर: चालू नोव्हेंबर महिन्याच्या आत पारनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानासह रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन खा. डॉ. सुज़य विखे यांनी शेतकऱ्यांना दिले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी खा. विखे हे पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. खा. विखे यांनी तालुक्यातील भाळवणी, वासुंदे, कर्जुले हर्या येथील अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी केली, या वेळी ते बोलत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. विखे यांनी या वेळी सांगितले.

या वेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष ॲड. बाबासाहेब खिलारी,बाज़ार समितीचे व्हा. चेअरमन विलासराव झावरे, नायब तहसीलदार रमेश काथोटे, गटविकास अधिकारी किशोर माने,

तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर,अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सागर मैड, तुषार पवार, बबन डावखर, रघुनाथ आंबेडकर, महादू भालेकर, दिलीप पाटोळे, मोहन रोकडे, किसन धुमाळ यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. या वेळी खा. विखे म्हणाले, शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली आहे.

तालुक्यात कांदा ज्वारी, तूर व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शंभर टक्के नुकसान दाखविले जाणार असून,सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्वारी पिकाचा गेल्या वर्षीचा विमा मिळण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात उपोषण करू. सेवा संस्थेने पीकविमा भरण्यासाठी काम करावे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत.

सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व भावना जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सोलर यंत्रणा गावात उभारून भरीव काम केले जाणार असल्याचे खा. विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!