अहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने तीन जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हे तिघेही नगर शहर परिसरातील आहेत. यात इस्सार उर्फ टकलू मुक्तार शेख (कोठला), आशिष रघुवीर गायकवाड ( तारकपूर) आणि स्वप्निल अशोक ढवण  (ढवण वस्ती, सावेडी ) यांचा समावेश आहे.

नगर उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे पोलीस विभागाकडून तिघांच्या कारवाई संबंधी  प्रस्ताव दाखल झाले होते,  पोलीस ठाण्यांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात तिघांच्या विरुध्द तोफखाना पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सूची नमूद करण्यात आली.

तसेच संबंधीतांकडून कायदा ,सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तवीण्यात आली. पोलीस ठाण्याकडून प्राप्त प्रस्तावावर विचारविनिमय करीत उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तिघांना आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून आगामी एक वर्षांच्या अवधीसाठी जिल्हा हद्दीतून हद्दपार केले आहे.