जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात चोरी

अहमदनगर : परीविक्षाधीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कुलूप कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील ६०० रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सकाळी ९ ते बुधवार (दि.१३) सायंकाळी ७ वाजेदरम्यान स्टेशनरोडवरील बकुल बंगला येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल या लग्नसमारंभाकरिता दिल्ली येथे जाण्याकरीता शिर्डी विमानतळाकडे शुक्रवार (दि.८) रोजी गेल्या.

त्यावेळी त्यांनी बंगल्याच्या सर्व खिडक्या, दरवाजे, मेन दरवाजा व्यवस्थित लॉक करुन गेल्या होत्या. त्यानंतर बुधवारी (दि.१३) सायंकाळी त्या माघारी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.

त्यांनी घरात जावून पाहिले असता फ्रिजच्या बाजूला असलेल्या कपाटातील व किचनमधील सामान अस्ताव्यवस्त पडलेले दिसले.

तेथे मित्तल यांच्या पतीची ५०० रु. किंमतीची चप्पल व लोखंडी कात्री चोरीस गेल्याचे आढळून आले. याबाबत कोतवाली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment