मनामध्ये जर एखादे ध्येय पक्के असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी काही पण करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कसल्याही बिकट अशा आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीतुन मार्ग काढत ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर घरामध्ये जर शिक्षणाची कुठलीच पार्श्वभूमी नसेल किंवा कुठल्याही प्रकारचे आर्थिक दृष्टिकोनातून किंवा कौटुंबिक वातावरणातून पोषक वातावरण नसेल तर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात.
समाजामध्ये आपण पाहतो की आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते व घरच्यांना आर्थिक आधार म्हणून वाटेल ते काम करावे लागते. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर आर्थिक परिस्थितीचा खूप मोठा परिणाम होताना दिसून येतो.

परंतु याही मध्ये काही तरुण किंवा तरुणी अशा असतात की या परिस्थितीशी दोन हात करतात व मार्ग काढून शिक्षणाचा महामेरू पार करतात व स्पर्धा परीक्षांसारख्या क्षेत्रामध्ये देखील घवघवीत यश मिळवतात. अगदी याच पद्धतीने जर आपण वर्धा जिल्ह्यातील अजय नैताम या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास पाहिला तर तो थक्क करणारा आहे.
अजयची संघर्षकथा
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दुर्गम डोंगराळ भागातून आलेला व शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचे पोषक आणि सकारात्मक वातावरण असताना देखील अजय नैताम या विद्यार्थ्याने शिक्षणामध्ये खूप मोठी भरारी घेतली असून नक्कीच ती इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.
शिक्षणाची सुरुवात पाहिली तर जिल्हा परिषद शाळेतुन व पुढे अग्निहोत्री फार्मसी मधून पदवी प्राप्त केली. मनामध्ये इच्छा तर खूप मोठ्या होत्या परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. वडील गुरे राखण्याचे काम करतात तर आई मोलमजुरी करते व कसेबसे उदरनिर्वाह करतात. यामध्ये शिक्षणासाठी पैसा आणणे किंवा खर्च करणे ही तर खूप लांबची गोष्ट होती.
त्यांनी वर्धा आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे आर्थिक मदत मागितली व या प्रकल्पाकडून जी काही मदत करण्यात आली ती पुरेशी नव्हती. त्यामुळे अजय याचा मित्र प्रफुल्ल गेडाम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केले व या माध्यमातून आदिवासी फेडरेशनचे डॉ. गजानन सयाम यांनी 22 हजार रुपयांची रक्कम अजयच्या खात्यावर ट्रान्सफर केली व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला.
त्यानंतर अजयने मागे फिरून पाहिले नाही व पात्रता परीक्षांची तयारी जोरात सुरू केली. त्यानंतर अजयने राष्ट्रीय पातळीवरील जी पॉट, नायपर जेईई, सीयुइटी पीजी अशा तीनही परीक्षा पहिल्या टप्प्यांमध्येच पास केल्या. यामध्ये त्यांनी कोलकत्ता नायपर पसंत केले. अजयची कौटुंबिक परिस्थिती देखील खूप बेताची आहे.
अक्षरशः त्यांचे कुटुंब कुडाच्या घरामध्ये राहते. परंतु अजयने मिळवलेले हे यश किंवा भरारी पाहून त्याचे आता सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये अजयला अनेक हातांनी मदत केली. यामध्ये आमदार भीमराव केरम तसेच माजी पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले, माजी विक्रीकर उपायुक्त ज्ञानेश्वर मडावी तसेच सतीश आत्राम, प्राचार्य कोडापे तसेच गंगाधर पुरके इत्यादी असंख्य हितचिंतकांनी मदत केली असल्याचे देखील अजयने आवर्जून सांगितले.
अशा पद्धतीने आर्थिक परिस्थिती कितीही बेताची राहिली तरी देखील जर इच्छा असेल व ती पूर्ण करायचे असेल तर परिस्थितीशी संघर्ष करताना मार्ग सापडतो हे आपल्याला कळते.