शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर ! आहार तज्ज्ञांनी सांगितली ही माहिती

Health News

Health News : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर असून उन्हाळ्यात कांदा खाण्याचे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना शारीरिक थकवा आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी, उष्माघातच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो.

त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार असलेल्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अति उष्णतेमुळे थकवा, चिडचिड आणि मानसिक आरोग्यावरही याचा दुष्परिणाम दिसून येतो.

म्हणून उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात सॅलेड आणि जेवणामध्ये कांद्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

कांद्यामध्ये क्के सेंटिन आणि सल्फर नावाचे घटक असतात, जे शरीरातील घाम शोषून घेऊन शरीराला थंड करतात आणि उष्णता कमी करतात.

क्के सेंटिन हिस्टामाइन्सला दूर पळवते. हिस्टामाइन्स रसायनामुळे उष्णतेपासून आपल्याला अॅलर्जी होऊ शकते. कांदा पचनक्रियेशी संबंधित एन्झाइम्स सक्रिय करतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

कांदा हा फायबर आणि प्रीबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे, जे आतड्यांमधील बॅक्टेरियाला पोषक तत्वे पुरवतात. या बॅक्टेरियांमुळे फॅटी अॅसिड तयार होते, जे पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.

कांद्यामधील क्रोमियम रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवते. कांद्यामुळे वारंवार लघवी लागते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे कांद्याच्या अर्काच्या सिस्टीन सल्फोक्सिड गोळ्या घेतल्यामुळे झोप सुधारते.

उन्हाळ्यात कांद्याचा समावेश सॅलेड आणि कोल्ड सूपमध्ये करू शकता. चांगल्या चवीसह तुम्ही पौष्टिक आहार घेऊ शकता.

त्यामुळे दररोज जेवणात कांद्याचा समावेश करा. सॅलेड्स, सँडविच आणि इतर पदार्थांमध्ये कांद्याचा समावेश करा. शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी आणि टरबूज यांसारख्या पाणीयुक्त पदार्थांसह कांद्याचे सेवन करा.

जेवण करताना तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये कांद्याचे काप खाण्याचे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे.

कांद्यामुळे इलेक्ट्रोलाइट संतुलन

कांदा हा नैसर्गिकरित्या थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात आहारामध्ये कांद्याचा समावेश फायदेशीर ठरतो. कांद्यामध्ये असलेले पाणी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात. याशिवाय यात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते,

जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात. यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे विशेषतः व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असतात. या घटकांमुळे शरीराला पोषक घटक मिळतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe