भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्याचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

असे असताना भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

शेतकरी आंदोलनावरून वातावरण चांगलेच तापले असताना माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी नव्या शेतीविषयक कायद्यांना विरोध दर्शवला. नव्या कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन हे आता केवळ शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित नसून सर्वांचे आंदोलन झाले आहे असं ते म्हणाले.

शुक्रवारी हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यातील संपला गावात ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छादेखील बिरेंद्र सिंग यांनी व्यक्त केली. “मी या शेतकऱ्यांसोबत आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचं नव्हे, तर साऱ्यांचं आहे.

समाजातील एखाद्या ठराविक गटाचं हे आंदोलन नाही. मी आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहे. मी जर आंदोलनात सहभागी झालो नसतो तर लोकांना वाटलं असतं की मी केवळ राजकारण करत आहे. पण आता मी निर्णय घेतला आहे. तुम्ही कोणाशीही चर्चा करा. शिक्षक, विद्यार्थी, कामगार, मजूर, नोकरदार, गृहिणी… साऱ्यांना या आंदोलनाची काळजी आहे.

या आंदोलनावर तोडगा निघावा असं सगळ्यांनाच वाटतं. मीदेखील या आंदोलनाशी जोडला गेलो आहे. गेले ५-६ दिवस दिल्लीत थंडी खूपच जास्त आहे, पण ते आंदोलन करत आहेत. मीदेखील लवकरच दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे”, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe