अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील काही मोठ्या उद्योगपतींचे भागदार बनले असून, यामुळेच ते सर्वसामान्य जनतेशी संबंधित सर्वच गोष्टींची विक्री करत आहेत,’ अशी तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदींवर तोफ डागताना केली.
राहुल गांधी यांनी शनिवारी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फोडले. तद्नंतर त्यांनी एका खुल्या जीपवर स्वार होत सामान्यांत मिसळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मोदींवर काही उद्योगपतींसोबत संगनमत साधल्याचा आरोप केला. ‘मोदी काय करतात? त्यांची देशातील
तीन-चार मोठ्या उद्योगपतींशी भागीदारी आहे. ते लोक मोदींना माध्यमांची सेवा पुरवतात. त्या मोबदल्यात मोदी त्यांना पैसे उपलब्ध करवून देतात.
यामुळेच मोदी देश व तामिळनाडूच्या लोकांच्या मालकीची असणारी प्रत्येक गोष्ट विक्रीस काढत आहेत,’ असे राहुल म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला. ‘काँग्रेस एकच संस्कृती व भाषेवर विश्वास असणाऱ्या विचारधारेविरोधात संघर्ष करत आहे.
भारतात एकाच विचाराचे सरकार असावे, अशी त्यांची इच्छा आहे,’ असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींना तामिळनाडूची संस्कृती, भाषा व लोकांप्रती कोणताही सन्मान नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘तामिळी जनता, तामिळी संस्कृती आपले विचार व आपल्या संस्कृतीच्या अधिन राहावी, असे मोदींना वाटते.
राज्यातील अण्णाद्रमुक सरकारने त्यांच्याशी तडजोड केली आहे. परिणामी, मोदी सीबीआयसारख्या तपास संस्थांचा वापर करून आपल्याला हवे ते मिळवत आहेत. त्यामुळे मला तामिळनाडूतील गरीब जनता, शेतकरी, मजूर तथा छोट्या उद्योगपतींचा सन्मान करणारे सरकार स्थापन करण्यास मदत करावयाची आहे,’ असे ते म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved