सिव्हिल इंजिनियर असलेल्या शेतकऱ्याचा शेतीत क्रांतिकारी प्रयोग ! मल्चिंग पेपरवर विषमुक्त कांदा लागवड केली, पंचक्रोशीत चर्चा रंगली

Published on -

Successful Farmer : अलीकडे शेती व्यवसायात मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. शेती व्यवसायात आता शिक्षक तरुण मोठ्या हिरीरीने भाग घेत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित तरुणांनी शेतीत एंट्री घेतली असल्याने आता नवनवीन प्रयोग देखील पाहायला मिळत आहेत.

आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करून सुशिक्षित तरुणांनी आता शेती व्यवसायात क्रांतिकारक असा बदल घडवण्यास सुरुवात केली आहे. कमी खर्चात, कमी पाण्याचा वापर करत, विषमुक्त शेती करण्याचा प्रयोग देखील अलीकडे तरुण सुशिक्षित शेतकरी करू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सिविल इंजिनियरचे शिक्षण ग्रहण केलेल्या एका तरुणाने देखील शेतीमध्ये असाच भन्नाट प्रयोग केला आहे.

या तरुणाने मल्चिंग पेपरवर विषमुक्त कांदा लागवडीचा प्रयोग केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मौजे मांडवगण फराटा येथील अक्षय दादासाहेब फराटे या सुशिक्षित तरुणाने हा प्रयोग करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. खरं पाहता अक्षय यांच्या कुटुंबांचा पिढ्यानपिढ्या शेती हेच उदरनिर्वाहाच मुख्य साधन आहे.

हेच कारण आहे की सिविल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेले असतानाही अक्षय यांनी नोकरी ऐवजी शेतीला अधिक प्राधान्य देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोगाचा अंमल करण्यास सुरुवात केली आहे. अक्षय यांनी आपल्या प्रयोगाबद्दल बोलताना सांगितले की, सध्या पारंपारिक शेती करणे जीकीरीचे आणि जोखीम पूर्ण झाले आहे.

शिवाय पारंपारिक शेतीमध्ये उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. यामुळे त्यांनी अनावश्यक खर्च टाळणे हेतू मल्चिंग पेपरवर विषमुक्त कांदा शेतीचा प्रयोग केला. त्यांनी हा प्रयोग आपल्या दोन एकर शेत जमिनीवर केला आहे. अक्षय यांनी पूर्व मशागत केल्यानंतर सरी पाडल्या, यानंतर बेसल डोस, खतांची मात्रा टाकण्यात आली.

यानंतर सरी सपाट करून ठिबक सिंचन टाकले मग मल्चिंग पेपर आथरण्यात आले. त्यानंतर मल्चिंग पेपर वर होल पाडून कांदा लागवड करण्यात आली. अशा पद्धतीने कांदा लागवड केली असल्याने विद्राव्य खते हे ठिबक सिंचनाने दिले जाणार असून खतांचा अपव्यय पाण्याचा अपव्यय टाळा जाणार आहे.

तसेच यामुळे पिकात तन वाढणार नसल्याने तणनाशकाचा, निंदनीचा होणारा खर्च टळेल. यामुळे औषधांचा तसेच खतांचा खर्च देखील निम्म्याने कमी होणार आहे. तसेच उत्पादनात वाढ होणार असून 17 ते 20 टन एवढं विक्रमी उत्पादन त्यांना मिळण्याची आशा आहे. अक्षय यांच्या मते यामुळे पिकात कीटकांचे आणि रोगांचे सावट कमी होईल.

परिणामी कीटकनाशकांसाठी येणारा खर्च कमी होईल शिवाय विषमुक्त उत्पादन मिळेल. निश्चितच उच्चशिक्षित अक्षय यांचा हा प्रयोग इतरांसाठी प्रेरक ठरणार आहे. विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे. म्हणून अशा प्रयोगाच्या माध्यमातून जर विषमुक्त शेती आणि उत्पादनात वाढ देखील होत असेल तर निश्चितच अशा प्रयोगाचे अनुकरण भविष्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केल जाऊ शकत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe