दिलासादायक ! घरपट्टी, नळपट्टीचा ५० टक्के कर माफ करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने राज्यासह जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन, कठोर निर्बंध यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे.

यातच अनेकांचे आर्थिक चाक देखील गालात रुतलेले आहे. एकीकडे हे सगळं असताना जामखेड तालुक्यामधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियाेजन कोलमडले. त्यातच ग्रामपंचायत पातळीवर विकास निधीला कात्री लागली.

अशा परिस्थितीतही मोहा ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका शिवाजी डोंगरे यांनी ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी बैठकीत ठराव करून घरपट्टी, नळपट्टीचा ५० टक्के कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

कोरोनाचा सर्वाधिक फटका गावखेड्यांना बसला आहे. लाॅकडाऊनमुळे रोजगारही बंद आहे. अशा काळातही सर्व सरकारी कर भरावे लागत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मोहा ग्रामपंचायतीने मात्र वेगळा विचार करून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. सरपंच सारिका शिवाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत ५० टक्के करमाफीचा ठराव मांडण्यात आला. व त्याला एकमुखाने संमती देण्यात आली आहे.