वसुली मोहिम थांबवून शेती पंपासाठी पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज देण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- विद्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्‍यांकडून सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्‍यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नगर- औरंगाबाद महामार्गावरील पांढारीपुल येथे शेतकर्‍यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष बबन वाघुले, शहर उपाध्यक्ष विनोद साळवे, नेवासा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, नगर तालुकाध्यक्ष राम कराळे, माजी सरपंच कैलास पठारे, शाहीर कान्हू सुंबे, गणेश भिसे, हरीभाऊ हारेर, रमेश काळे, पांडूरंग वाघ,

संतोष बोरुडे, संभाजी भिसे, रावसाहेब भवार, बाळासाहेब आवारे, दिपक साळवे, ह.भ.प. राजेंद्र महाराज पाटोळे, सुमन आवारे, राजेंद्र खंडागळे, अमोल भवार, शरद पादर आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी सहभागी झाले होते. रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्‍यांना काही वेळानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस प्रशासनाने बाजूला घेऊन रस्ता रहदारीसाठी मोकळा करुन दिला.

या मागणीचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांना देण्यात आले. शेतकर्‍यांचा वीज पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यास आनखी तीव्र पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिला. शिवसेना तसेच इतर मित्र पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत शेती पंपाचे वीज बिल माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते.

सत्तेवर आल्यानंतर राज्य कर्त्यांना या आश्‍वासनाचा विसर पडला आहे. आज शेतकरी उपाशी असून, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके देखील चांगल्या प्रमाणात येत आहे. मात्र विद्युत महावितरणने बिल न भरल्याचे कारण पुढे करुन जिल्ह्यातील नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी जिल्ह्यातील तालुक्यामध्ये महावितरण कंपनीने शेतीपंपाची वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे.

या प्रकरणावरुन सरकारची बेबंद मोघलशाही माजली असल्याचे चित्र आहे. राज्यातील ठराविक शेतकरी समृद्ध आहेत. त्यांचे निकष सर्वांसाठी लावता येणार नाही. अल्पभूधारक शेतकर्‍यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने एक आठवडा दिवस आणि एक आठवडा रात्रीची वीज देण्याचे नावापुरते जाहीर केले आहे.

ही घोषणा शेतकर्‍यांची थट्टा करणारी आहे. दिवसाची विज नावापुरती असून, ती किमान चार तास सुद्धा मिळत नाही. खरीप रब्बी आणि चारा पिकांना रात्रीचे पाणी देता येते का? हा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शेतकर्‍यांची वीज पंप बंद असताना देखील त्यांची बिले आकारण्यात येतात.

काही शेतकर्‍यांना महावितरणने अनेक वर्षापासून बिले देखील दिलेली नाहीत. एकदम बिल पाठवून त्यांच्याकडून वसुलीचा आग्रह धरला जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व घरी असताना शेतात शेतकरीने राबून सर्वांचे पोट भरले आहे. याचा विचार करण्याची देखील गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महावितरण कंपनी वीज बिल कायदा 2003 ची अंमलबजावणी करावी, विद्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्‍यांची सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्‍यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe