अनलॉक झालेला असतानाही कर्मचारी तोंडी आदेशाने दुकाने चार वाजता बंद करण्यास सांगतात…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अनलॉक झालेला असतानाही कर्मचारी तोंडी आदेशाने दुकाने चार वाजता बंद करण्यास सांगतात, हे अयोग्य असून राहाता शहरातील दुकाने पूर्णवेळ चालू ठेवावीत, अशी मागणी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केली आहे.

मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात पठारे यांनी म्हटले आहे, की दोन ते तीन महिन्यांपासून छोट्या- मोठ्या दुकानदारांचे व्यवसाय बंद आहेत. सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने जिल्ह्यात अनलॉक करून व्यापारी दुकानदारांसाठी निर्बंध शिथील केले आहेत.

असे असतानाही राहाता नगरपालिकेचे कर्मचारी शहरात फिरून व्यापाऱ्यांना चार वाजताच दुकाने बंद करण्यास सांगत आहेत. राहाता शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे, तसेच व्यापाऱ्यांची उपासमार होत आहे.

या परिस्थितीचा विचार करता शहरातील दुकाने काही दिवस पूर्णवेळ चालू ठेवावी, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास त्यावर निर्बंध घालण्यात यावे, अशी विनंती पठारे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe