अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. दरदिवशी आकडेवारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. यातच खासदार सुजय विखे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

करोनाच्या सुरवातीच्या काळात लॉकडाऊनचा आग्रह लावून धरलेले नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही आता लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका घेतली आहे.
‘या टप्प्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असे खासदार या नात्याने आपले मत आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. विखे यांनी लॉकडाऊन करा, अशी आग्रही भूमिका घेतली होती.
त्यावरून त्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हा प्रशासनासोबत खटकेही उडाले होते. करोनाची स्थिती हातळण्यासाठी लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय असल्याची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती.
दरम्यान जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू लागल्याने याबाबत खासदार सुजय विखे यांची प्रतिक्रिया जाणूनन घेण्यात आली. याबाबत विखे म्हणाले, ‘मला वाटते आता लॉकडाऊनचा काही उपयोग होणार नाही.
लोकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकांनी शिस्त पाळली तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग निघेल. मात्र, सध्या ज्या पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम होत आहेत, तेथील गर्दी टाळली पाहिजे.
जर जीवन सुरळीत होत चालले आहे तर लॉकडाऊन हा काही यावरील उपाय नाही. आता कोठे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे,
व्यवसाय सुरळीत होत आहेत, अशा परिस्थिती लॉकडाऊन करून उपयोग नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन करू नये, असे खासदार या नात्याने माझे मत आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved