देशाची चिंता वाढवणारी बातमी…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं.

ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनची चाचणी घेतली जात होती. यामध्ये ४५० किमी दूरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला जो अपयशी ठरला.

“क्षेपणास्त्र डागल्यानंतर अवघ्या काही काळामध्येच ते पडलं. सोमवारी सकाळी ही चाचणी करण्यात आली. हे असं का घडलं या मागील कारणांचा तपास डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) वैज्ञानिक आणि ब्रम्होस अरोस्पेस कॉर्परेशनच्या टीम्सकडून केला जाणार आहे,”

अशी माहिती सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. ‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियाने मिळून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.

चाचणीदरम्यान हे क्षेपणास्त्र फारच कमी वेळा अपयशी ठरलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार लॉन्चिंगच्या वेळी झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे चाचणी अपयशी ठरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र नक्की काय गोंधळ झाला हे संपूर्ण तपासणी केल्यानंतर स्पष्ट होईल असं सुत्रांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News