अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र अनेक दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवतो आहे.
यामुळे लसीकरण ठप्प होत आहे. याच मुद्द्यावरून आमदार संग्राम जगताप यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.
शहराची लोकसंख्या पाहता पाच लाखापर्यंत डोस उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु, त्या तुलनेत लस उपलब्ध होत नाही. सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेने लस खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केलेली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. लसीकरणाचे काम पुढील तीन महिने चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मंगल कार्यालये भाडेतत्त्वावर घेऊन तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
पुरेशी लस उपलब्ध झाल्यास दिवसभर लसीकरणाचे काम चालेल. त्यामुळे केंद्रांवर गर्दी होणार नाही. सर्वांना लस मिळेल, असे नियोजन करण्यात येत आहे. येत्या जूनमध्ये मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे, असे जगताप म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम