देशातील लोक सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मोठा फटका बसला आहे. तर वादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली.

मात्र, त्यानंतर झालेल्या मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली.

त्यानंतर ममतांना झालेल्या विलंबावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. याच टीकेला आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे .

भाजपाकडून होत असलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत पलटवार केला. महुआ मोईत्रा यांनी एक ट्विट करत भाजपावर टीकास्त्र डागलं.

“३० मिनिटं उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत.

लशीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असे म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला उत्तर दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe