मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात (Pune) सभा होती. यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखमध्ये (Ladakh) एकत्र जेवतात दिसले आहेत, असा दावा केला असून हे सर्व ढोंगी आहेत, यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
हे सर्व राजकारण सुरू आहे. तुम्ही हे राजकारण समजून घ्या. ज्यांना हिंदूत्त्व झोंबलं, लाऊडस्पीकर झोंबले ते सर्व आपल्याविरोधात एकत्र आले. हे फक्त दाखवण्यापुरते आपसात भांडत असतात.
साधी गोष्ट आहे. हनुमान चालीसेवरून एवढा गोंधळ झाला. राणा दाम्पत्याला मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचायची होती. मोतोश्री काय मशिद आहे का? मग त्यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये झालेला राडा सर्व राज्याने पाहिला.
नको ते आरोप करण्यात आले. मात्र त्यानंतर तेच राणा दाम्पत्य आणि संजय राऊत हे लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसून आले. एकत्र फिरताना दिसून आले. याचे शिवसैनिकांना काहीच वाटत नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
तसेच या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आज सभागृहात का सभा घेतली यावरून विविध तर्कवितर्क लावले जात होते. यावेळी सध्या पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून सभा इथे आयोजित केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
तर याचवेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना देखील टोला लगावला. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे उगच पावसात भिजण्याची गरज नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.