दोघा भावांनी केला जन्मदात्याचाच खून… अहमदनगर जिल्हा हादरला !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यात येथे मुलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय, वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचाच खून केला.

संगमनेर तालुक्यातील चिखली गावातील वीट भट्टीवर ही घटना घडली आहे. येथील दशरथ सुखदेव माळी (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) यांचा खून झाला. गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेच्या तपासात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी रामदास दशरथ माळी आणि अमोल दशरथ माळी या भावांना अटक केली आहे. वडील दशरथ यांचा सांभाळ कोणी करायचा यावरून रामदास आणि अमोल या दोघा भावांमध्ये वाद होता. यावरून अनेकदा भांडणही झाले.

मंगळवारी रात्री याच विषयावरून त्यांच्यात वाद पेटला. हा वाद विकोपाला जाऊन मारामारी सुरू झाली. या वादात वडील मध्ये आले असावेत. त्यामुळे दोन्ही मुलांनी वडिलांच्या डोक्यात मारहाण केली. त्यांचा गळा दाबून खून केला.

याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. दोन्ही आरोपी मुले तेथेच होती. त्यांना अटक करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe