नगरकरांवर जल संकट ! शहरातील पाणी पुरवठा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- नगर शहरातील पाणीपुरवठा योजनेला वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

वादळी वारा आणि पावसामुळे शहरात बर्‍याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाण्याचा आणि हवेचा दाब कमी जास्त होऊन रात्री साडेबाराच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली,

अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान रविवारी पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या शहराच्या मध्यवर्ती भागात रविवारी पाणी मिळाले नाही.

शहराच्या उपनगरांना उशिरा आणि कमी दाबाने पाणी मिळाले. आज (सोमवार) सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, सर्जेपुरा, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवीपेठ, माणिक चौक,

सावेडी गावठाण व बालिकाश्रम रोड या भागात पाणीपुरवठा होणार आहे. तर झेंडीगेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा,

रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, कोठी या भागाला उद्या (मंगळवारी) पाणी मिळणार असल्याची माहिती मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe