Ahmednagar News : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे आता शासनाने शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आणली आहे. यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२४ मध्ये विविध १९ पिकांसाठी राज्यांतर्गत खरीप हंगामातील पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मूग, उडीद पिके ३१ जुलै तर अन्य पिकांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदत शासनाने दिली आहे. या स्पर्धेत राज्य पातळीवर जो शेतकरी पहिला क्रमांक पटकावेल त्यास राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
सर्वात प्रथम म्हणजे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत प्रवेश पत्र भरल्याचे चलन सातबारा, आठ अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बँक खाते/चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.
या आहेत अटी
या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व स्वतः जमीन कसत असणे आवश्यक आहे. एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता भात पिकासाठी किमान २० गुंठे व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० गुंठे म्हणजेच एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी असेल शुल्क
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पीकनिहाय वेगवेगळे असून सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये व आदिवासी गटासाठी दीडशे रुपये असेल अशी माहिती समजली आहे.
जाणून घ्या मुदत
भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.