२४ वर्षांच्या मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने आई, वडिलांसह भावाची आत्महत्या

Published on -

नागपूर मध्ये  २४ वर्षांच्या मुलीने पळून जाऊन इतर जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली येथे सोमवारी घडली.

आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी आढळली नसली तरी या परिसरात मुलगी पळून गेल्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. रवींद्र नागोराव वरगंटीवार (५०), वैशाली रवींद्र वरगंटीवार (४३) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (१९) अशी मृतांची नावे आहेत.

रवींद्र यांच्या मुलीचे इतर जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेमविवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, कुटुंबीयांना हा मान्य नसल्याने त्यांनी तिला नकार दिला. परंतु, प्रेमविवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी पळून गेली.

यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केला. घटनेनंतर कुटुंबीय अस्वस्थ होते. अनेकांनी समजूत काढल्यानंतरही ते विरोधावर ठाम होते. याच तणावातून तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.

सोमवारी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान विवेकानंद नगर परिसरातील मोकळ्या जागेतील विहिरीत तिघांनीही उड्या घेतल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नाेंदवला असून तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe