आ.राजळेंवर कारवाई होते मग स्नेहलता कोल्हेंवर का नाही?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- गेल्या आठवड्यात कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आरक्षणाचा नावाखाली बेकायदा गर्दी जमवून बराच काळ नगर मनमाड रस्ता बंद केल्याबद्दल व शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोपरगाव तालुका प्रशासनाने गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला विचारला आहे.

या वेळी बोलताना वहाडणे यांनी सांगितले की, ओबीसी ना राजकिय आरक्षण मिळावे यासाठी भाजपाने महाराष्ट्रभर रस्ता रोको, चक्का जाम अशा स्वरूपाची आंदोलने केली.अनेक ठिकाणी आंदोलक व आंदोलक नेत्यांवर गुन्हे दाखल झाले,

अनेक नेत्यांना अटकही झाली.कोपरगाव साईबाबा चौफुली येथे झालेल्या रस्ता रोकोमुळे नगर मनमाड हायवे तीन तास ठप्प झाला,वाहने अडकून पडले,प्रवाशांचे हाल झाले.अनेक अवजड वाहने गोदावरीच्या लहान पुलावरुन शहरातून वळविली,त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला.

कोविड मुळे १४४ कलम लागू असतांनाही शेकडोंचा जमाव जमवून अनेकांनी विषय सोडून भाषणे ठोकण्याची खाज भागवून घेतली.जमावबंदीचा भंग केला म्हणून संबंधितांवर गुन्हे का दाखल केले नाहीत.त्यावेळी मे. तहसीलदार, पोलीस निरीक्षकही उपस्थित होते,त्यांनी कारवाई का केली नाही?आपल्याच जिल्ह्यात त्याचवेळी आंदोलन करणाऱ्या आ.मोनिकाताई राजळे यांच्यावर कारवाई झाली.

पण कोपरगावचे प्रशासन कोल्हे यांच्या दबावाखाली काम करते कि काय? सामान्य जनतेवर कायद्याचा बडगा उगारणारे अधिकारी कारवाई करायला का घाबरले?अशामुळे स्वतःच्या मस्तीत राजकारण करणारे जास्तच उंडारतील,प्रशासनाचाही नैतिक अधिकार कमी होतो हे लक्षात घ्या.अजूनही वेळ गेलेली नाही,संबंधीत नेते व जमाव यांच्यावर कारवाई करा.

अन्यथा यानंतर मलाही वेगळ्या मार्गाने जावे लागेल.आम्ही प्रशासनाला सहकार्य करायचे व काहींनी कायदे धाब्यावर बसवून कोरोनाचा धोका असूनही मनमानी करायची हे योग्य नाही.नेत्यांनी बडेजाव स्वतःच्या घरी दाखवावा,सामान्य जनतेच्या जीवित धोक्यात आणू नये तसेच प्रशासनाने यावर वेळीच दखल घ्यावी असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आवाहन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe