कोल्हापूर जिल्ह्यातील जवळचे प्रेक्षणीय स्थळ व मिनी महाबळेश्वर म्हणजे सादळे-मादळे होय. हा परिसर वर्षांतील तिन्ही ऋतूंत वेगवेगळी अनुभूती देत असतो; पण हाच सादळे-मादळे परिसर सध्या अवैध व्यवसाय, खून, अनैतिक प्रकार, हुल्लडबाजी, अस्वच्छता यामुळे शापित बनत चालला आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत, पोलीस खाते, वन खाते आणि जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे.
जोतिबा-पन्हाळगडाच्या पायथ्यापासून पुणे-बंगळूर महामार्गाच्या शिये, कासारवाडी घाट, टोप परिसरात सादळे मादळेची पर्वतरांग आहे. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी. या दरीतून पंचगंगा नदीचे, कोल्हापूर शहर आणि परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य असे हे प्रेक्षणीय स्थळ अलीकडे जिल्ह्यातील धनिकांच्या नजरेस पडले अन् तेथील शेतजमिनी स्थानिक शेतकऱ्यांकडून अक्षरशःकवडीमोलाने लुटून घेतल्या आहेत.

झाडी, डोंगर, दरी, हिरवाई
काही जमिनी तर गुंतवणूक म्हणून खरेदी करून अडवून ठेवल्या, तर काही जमिनींवर रिसॉर्ट आणि फार्म हाऊस झाले आहेत. रस्त्याकडेला असलेल्या काही स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी विकून राहिलेल्या पाच-दहा गुंठ्यांत ढाबे, हॉटेल, घरगुती खानावळी सुरू केल्या आहेत. येथील काही भाग वन खात्याच्या ताब्यात, तर काही भाग ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. या ठिकाणी असलेली झाडी, डोंगर, दरी, हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतो.
दारूच्या बाटल्यांचा खच
जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून अनेक टोळकी दंगामस्ती व हुल्लडबाजी करण्यासाठी सादळे-मादळे येथे येतात. डोंगर भागात अशा हुल्लडबाज टोळ्या राजरोसपणे मैफल मांडत असतात. पार्टी झाल्यानंतर रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि स्नॅकसाठी आणलेल्या प्लास्टिक पिशव्या व कचरा या निसर्गरम्य परिसरात टाकून जातात. मद्यपान, नशिल्या पदार्थांचे सेवन करून दारूच्या बाटल्यांचा खच, रिकाम्या काचेच्या प्लास्टिकच्या बाटल्या, पाकिटे असा कचरा विखुरलेला असतो.
विकासाच्या अनेक संधी
पर्यटन वाढीला चालना देणारा, रोजगाराच्या, विकासाच्या अनेक संधी निर्माण करणारा हा परिसर अवैध, अल्पसंतुष्ट प्रवृत्तींमुळे पोखरला जात आहे. यासाठी येथील अवैध व्यवसाय, गैरप्रकार, अस्वच्छता यांना चाप लावण्याचे काम संबंधित पोलीस, वन विभाग व विविध शासकीय यंत्रणांनी नियमित करणे गरजेचे आहे.
रिसॉर्टच्या नावावर लॉजिंग
सादळे-मादळे परिसरातील हॉटेल्स प्रेमीयुगुलांसाठी सुरक्षित ठिकाण ठरली आहेत. दिवसेंदिवस हे अनैतिक प्रकार वाढले आहेत. दुसऱ्या बाजूला हॉटेल, रिसॉर्टच्या नावावर लॉजिंग व्यवसाय म्हणजे विनापरवाना मद्यपान, प्रेमीयुगुलांच्या अनैतिक संबंधांचे अड्डे बनले आहेत. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्यांकडे बारचे परवाने असतील.अनेक छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करून देताना दारू प्यायला बसण्याची व्यवस्था केली जाते. अशा काही हॉटेलचा परवाना आहे का, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या आवाजाने वाजवली जाणारी गाणी ही स्थानिक रहिवाशांना रोज डोकेदुखी ठरत आहे.
राज्यातील एक सुंदर पर्यटनस्थळ…
ग्राहक मिळवण्यासाठी व्यावसायिक नवनवे फंडे वापरतात. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या वरिष्ठांची सरबराई करण्यासाठी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा येथील वावर मात्र नेहमी चर्चेत आहे. वरकमाईचे साधन म्हणून या परिसराकडे पाहताना खऱ्या अर्थाने हा निसर्गसंपन्न परिसर पर्यटनस्थळ व्हावा, यासाठी अवैध प्रकार थांबवून बाहेरगावांहून येणाऱ्या पर्यटकांना अपेक्षित शांतता, स्वच्छता, सुरक्षितता, सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन आकर्षित केले तर राज्यातील एक सुंदर पर्यटनस्थळ या ठिकाणी बनू शकते.