आ.जगताप यांच्याकडून महापालिकेचा निषेध

Published on -

अहमदनगर : शहरामध्ये गणेशाचे आगमन भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील रस्त्याचे पॅचिंग, कचऱ्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात होता, परंतु यावर्षी महापालिका प्रशासनाच्या उदासीनपणामुळे कुठलीही उपाययोजना झाली नसल्यामुळे नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

याबाबत आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेचा निषेध व्यक्त करत २ दिवसांत उपाययोजना न झाल्यास महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आ.जगताप यांनी दिल्लीगेट परिसरातील रेंगाळलेल्या बंद पाईप गटारीचे कामाची पाहणी केली.

यावेळी राजूमामा जाधव, रेश्मा आठरे, राजेश आठरे, सुरेश वाकचौरे, तसेच परिसरातील व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते. दिल्लीगेट मार्गावरून मोठ्या प्रमाणात उपनगरामध्ये नागरिक येजा करीत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या बंद पाईप गटारीचे काम आहे. महापालिका व बांधकाम विभागामध्ये समन्वय नसल्याने या कामास विलंब होत आहे.

त्यामुळे नागरिकांना याभागातून जाताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या कामाला शासनाचा निधी असतानाही जर कामे वेळेवर होत नसतील तर महापालिका प्रशासन काय करते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

काही विघ्नसंतोषी मंडळीप्रमाणे नगर शहर बदनाम करण्यामध्ये प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. नगर शहरामध्ये मित्रमंडळ, तरुण मंडळे मोठ्या उत्साहाने आकर्षक धार्मिक देखावे सादर करत असतात. तसेच नागरिकही आपल्या घरी गणेशाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने करत आहेत.

अशा या वर्षातील सर्वात मोठ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाने कुठलीही खबरदारी घेतली नाही. दोन दिवसांत महापालिकेने शहरातील कचरा उचलणे, मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावणे, रस्ते पॅचिंगचे काम न केल्यास महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करु असा इशाराही आ.संग्राम जगताप यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe