काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : आमदार तांबे

Published on -

श्रीरामपूर | सध्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर गेली आहे. याला नोटाबंदी हे एक कारण आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. नवीन उद्योग सुरू नाहीत उलट अनेक कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे.

काँग्रेस पक्षाच्या काळात ही परिस्थिती नव्हती, असेही त्यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रेष्ठी ठरवतील परंतु पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

श्रीरामपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते शनिवारी बोलत होते. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक आदी प्रमुख उपस्थितीत होते. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक करून मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली.

या वेळी उपस्थितांपैकी काहींनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी केली जाईल, असे सांगून आता एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe