रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने मदत करावी

Published on -

लातूर, दि. ८ : जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले.

या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे.

भारतीय रेल्वेनेही या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची  मदत द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.

आज पहाटे औरंगाबाद तालुक्यातील सटाणा परिसरात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून घराच्या ओढीने रेल्वेमार्गावरून पायी निघालेले मजूर थकल्याने त्यांना झोप लागली आणि त्यातच  माल गाडीने त्यांचा बळी घेतला.

रेल्वेमार्गावरून गेल्यास आपणाला कोणीही आडवणार नाही आणि आपला घरापर्यंत प्रवास सुखरूप होईल या भाबड्या आशेने ते निघाले होते. परंतू या दुर्घटनेने त्यांची समजूत खोटी ठरली आणि हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आहे.

महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे.

भारतीय रेल्वेनेही आपली जबाबदारी ओळखून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

लॉकडाऊन मध्ये ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एसटीची सोय करण्यात केली जात आहे.

विशेष रेल्वेही सोडण्यात येत आहेत त्यामुळे मजुरांनी रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याचा धोका न पत्करता या सेवेचा लाभ घ्यावा आणि सुखरूप पणे घरी परत जावे, असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe