अहमदनगर :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
‘लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अनेकांनी आपल्याला आग्रह केला असला तरी आपण ही निवडणूक लढवणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित असून, त्यांच्याविरोधात प्रशांत गडाख उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा होती.
१९९१ मध्ये बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख यांच्या ऐतिहासिक लढतीनंतर २८ वर्षांनी सुजय व प्रशांत यांच्यातील लढत अपेक्षित मानली जात होती. मात्र, प्रशांत यांनी माघार घेतली आहे.
प्रशांत गडाख यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यात त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
‘राजकारण हे चांगले की वाईट क्षेत्र आहे, यावर खूप चर्चा होऊ शकतात. पण आज मला हे निश्चितच जाणवले की,
हे क्षेत्र खूपच असंवेदनशील झाले आहे आणि मग मी त्यात का पडावे, हे माझे मानसिक द्वंद सुरू आहे.
मला माझे मित्र, सर्व पक्ष, संघटना, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य समाज या सगळ्यांकडून लोकसभा लढवण्याचा आग्रह झाला. पण मी सध्या तरी राजकारणात न पडण्याचा निर्णय घेतला आहे.
पराभव व विजय याचा कधीच विचार केला नाही. कारण पराभव वा विजय नवनिर्मितीचा असला पाहिजे’, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.