बीडला पाणी गेल्याचा पुरावा दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ : आ. कर्डिले

तांदूळवाडी : विरोधी उमेदवारांना बोलायला कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने आता आपली अस्मिता जपण्याचे आवाहन करत आहेत. मात्र कै. रामदास पा. धुमाळ, कै. शिवाजीराजे गाडे यांना वेळोवेळी फसविले. डॉ. तनपुरे साखर कारखाना, सूतगिरणी बंद पडली तेव्हा आपली अस्मिता कोठे होती, असा सवाल उपस्थित करत बीडला पाणी गेल्याचा पुरावा दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे आव्हान आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिले.

राहुरी तालुक्यातील गणेगाव, गुहा, तांभेरे, निभेरे, वडनेर, कानडगाव, कनगर, चिंचविहिरे आदी ठिकाणी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारांशी प्रचार फेरीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आ. कर्डिले म्हणाले, की राहुरी नगरपालिकेत आमची सत्ता आली असती, तर किमान ५० टक्के प्रश्न सोडविले असते. पाणीपुरवठा योजना कधीच मार्गी लागली असती. १२ वर्षात मुळा धरणातून पाणी उचलण्याची परवानगी यांना मिळवता आली नाही. फक्त मामाचे नाव घेण्याशिवाय काहीच करता येत नाही. पाणीयोजना आम्हीच मंजूर केली आहे.

विरोधकांकडे आपण गुन्हेगार असल्याचा खोटाच मुद्दा शिल्लक आहे. लोकांचा विश्वास मिळवून आपण मते मिळविली. यावेळी एक लाख मते घेणार आहे. मी ५० कि.मी. वरून वाड्याच्यामागे दशक्रिया विधीला येतो. पण यांना घराच्या मागे येता येत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच बीडला पाणी जाण्याचा पुरावा दाखवला, तर त्यांना पाठिंबा देईल, असे सांगत कै. रामदास धुमाळ, कै. शिवाजी गाडे यांना वेळोवेळी फसविले. जि.प.मध्ये गाडे यांना समिती मिळू दिली नाही.

नगरपालिकेचा कारभार करता येत नाही आणि यांना आमदार होण्याचे स्वप्न पडत आहेत. हे झोपेत असताना मी तीन तालुके फिरून येतो, असे सांगत गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सभामंडप अशी अनेक विकास कामे पूर्ण झाली असेही त्यांनी सांगितले.