अस्मानीनंतर सुल्तानी संकट, संतप्त बळीराजाने कांद्याचे लिलाव बंद पाडले!

Ahmednagarlive24
Published:

नगर –  नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू होते. सोमवारी कांद्याचे भाव साडेचार हजार रुपये क्विंटलपर्यंत गेल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला. 

मात्र, गुरुवारी  सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याचे भाव अचानक १० ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत कांद्याचे लिलाव बंद पाडले.

आक्रमक झालेले शेतकरी थेट बाह्यवळण रस्त्यावर उतरले. त्यांनी तेथेच ठिय्या मांडल्याने बाह्यवळण मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

संतप्त शेतकऱ्यांनी थेट शहर बाह्यवळणावर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. कांद्याला भाव वाढून मिळावेत, यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिस प्रशासन दाखल झाले. सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.

शेतकऱ्यांच्या भावना तीव्र बनल्याने कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस मोठ्या फौजफाट्यासह आंदोलनस्थळी आले. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने काही शेतकऱ्यांचा कांदा भिजला होता. 

त्या कांद्याला अवघा एक रुपया किलो भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने नगर बाजार समितीतच कांद्याचे भाव इतके कमी का? असा सवाल शेतकरी करत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment