…तर पाणीप्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू

Published on -

पाथर्डी :- तालुक्याचा पूर्व भाग व बोधेगाव परिसराला मुळेचे पाणी द्यावे, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी निधीसह योजना मंजूर करून घ्यावी; अन्यथा राजकीय फायद्यासाठी लोकांना नादी लावण्याचा प्रकार समजून याचा जाब विचारू, असे जलक्रांती जनआंदोलनाचे संस्थापक दत्ता बडे यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले आहे, भालगाव, लाडजळगाव, बोधेगाव, टाकळीमानूर, वडगाव, चिंचपूर, करोडी, माणिकदौंडी या भागात कासार पिंपळगावपर्यंत आलेले पाणी शेतीसाठी द्यावे, यासाठी जलक्रांती जनआंदोलन चालू आहे. पाणीप्रश्नाचे राजकारण करत नेते निवडून आले. तथापि, मागील अनेक वर्षांत दुष्काळी भागात पाणी पोहोचू शकलेले नाही. खासदार डॉ. सुजय विखे यांनी निळवंडे कालव्यांचा पाठपुरावा करत कोणताही समारंभ न करता कामे सुरू केली.

आचारसंहितेपूर्वी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विखे यांच्या मदतीने कॅबिनेटची मंजुरी घ्यावी. दोन जिल्हा परिषद सदस्य व एकवीस गावांचे सरपंचसह दहा हजार शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देणार आहे. शासनाकडून योजनेला मंजुरी न मिळाल्यास प्रत्येक गावात जाऊन दहा – दहा रुपये वर्गणी गोळा करून फक्त पाणीप्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू, असे बडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe