कर्जत-जामखेड मतदारसंघात उभे राहणारे पुण्याचे पार्सल परत पाठवा…

Published on -

जामखेड :- असंघटित कामगारांकरिता राज्यात काही ठिकाणी कामगार कल्याण मंडळाकडून माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे.

ही व घरकुल योजना लवकरच नगर जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणा कामगार कल्याण मंत्री संजय भेगडे यांनी रविवारी केली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना २९ कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम चौंडीत झाला. यावेळी भेगडे बोलत होते.

भेगडे म्हणाले, कर्जत व जामखेड तालुक्यात आतापर्यंत तीन हजार कामगारांनी नोंदणी केली आहे. तीनशे कामगारांचे लाभार्थी म्हणून फॉर्म भरले आहेत. त्यांच्या खात्यावर पाच हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे.

राज्यात २०१४ पूर्वी फक्त ७० हजार कामगारांची नोंदणी होती, आता १८ लाख ७५ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. कामगारांचा अपघाती मृत्यू झाला, तर कुटुंबाला पाच लाख व नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये देण्यात येतात.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, कर्जत-जामखेडमधील २० हजार कामगारांची नोंदणी करायची आहे. आतापर्यंत तीन हजारांची नोंदणी झाली आहे. आपला भाग दुष्काळी असल्याने कामगारांना या योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम आपण करणार आहोत.

यावेळी बोलताना मंत्री भेगडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये पार्थ पवार यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतदेखील कर्जत-जामखेड मतदारसंघात उभे राहणारे पुण्याचे पार्सल परत पुण्याला पाठवा…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe