सातारा – भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर छ. उदयनराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनींच्या विक्रीसाठी सरकारकडून परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शनिवारी येथे केला.

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपाने दाखवले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
उदयनराजे हे १९९९ च्या आधी भाजपाचे आमदार आणि मंत्री होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांचा पराभव केला होता. नंतर ते त्यांच्या आईच्या माध्यमातून शरद पवारांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खासदार केले.
खासदार झाल्यानंतरही त्यांनी वारंवार पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. निवडणुका जवळ आल्या की ते पुन्हा पवारांना भेटायचे. त्यानंतर पक्षाचे तिकीट मिळवायचे आणि खासदार व्हायचे, असे मलिक म्हणाले.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा नक्कीच पराभव होईल. आम्ही त्यांना १९९९ च्या पराभवाची आठवण करून देऊ. ते कोणत्या पद्धतीने काम करतात तसेच रात्री आणि दिवसा कुठल्या अवस्थेत असतात हे सातारा जिल्ह्यातील जनतेला ठाऊक आहे. ते जरी पक्ष सोडून गेले तरी ती जागा आम्ही निवडून आणू, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













