सैनिक कुटुंबियांच्या प्रश्‍नांसाठी केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री ना. आठवले यांना निवेदन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- देशसेवेचे कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची पोलीस स्टेशनला तक्रारीची दखल घेतली जात नाही. सैनिक कुटुंबियांना जागेच्या वादातून धमकावण्याचे प्रकार होत आहे.

ही बाब गंभीर असून त्यादृष्टीने केंद्र सरकारने उपाययोजना करण्याच्या मागणीचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांना देण्यात आले.

ना. आठवले नुकतेच नगरमध्ये आले असता जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी त्यांची भेट घेऊन सदर प्रश्‍न मांडला.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब देशमाने, संतोष शिंदे, भगवान डोळे, अ‍ॅड.संदिप जावळे, खंडेराव लेंडाळ, हरिदास भाबड, जनार्धन जायभाये, सिध्दार्थ सिसोदे, रामकृष्ण काकडे आदि उपस्थित होते. देश रक्षणाचे कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांना जागा व इतर वादातून त्रास देण्याचे प्रकार घडत आहे.

नुकतेच उत्तर प्रदेश मधील फरीदपूर (जि. बरेली) येथील भारतीय लष्करातील जवान देवेंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांच्या लगत असलेल्या जागेत मोठे खोदकाम करुन त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सध्या देवेंद्र कुमार भूतान येथे देश सेवेसाठी कार्यरत आहे. सदर जवानाचे कुटुंबीय पोलीस स्टेशन व बरेली येथील पोलीस अधिक्षकांची भेट देखील घेतली.

मात्र जवानाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. देश रक्षण करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांच्या तक्रारी दखल घेऊन त्यांचा पोलीस यंत्रणेने देखील सन्मान केला पाहिजे असल्याचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

फरीदपूर (जि. बरेली) येथील भारतीय लष्करातील जवान देवेंद्र कुमार यांच्यासह देशातील अनेक जवानांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी केंद्र स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe