मोदी सरकारची हुकूमशाही वृत्ती व दडपशाहीसमोर आम्ही झुकणार नाही: थोरात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  केंद्र सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना शेतकऱ्यांच्या दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळ जाताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व इतर नेत्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले.

या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून मोदी सरकारची हुकूमशाही वृत्ती व दडपशाहीसमोर आम्ही झुकणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करत राहू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले, सरकारने पोलिस बळाचा वापर करून केलेली कारवाई लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत.

या मंडळींचा लोकशाही-संविधानावर विश्वास नाही, फक्त सरकारविरोधातील प्रत्येक आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग आणि पोलिसी बळ अवलंबायचे हीच भाजप सरकारची नीती राहिली आहे.

सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना बदनाम करायचे हा त्यांचा नेहमीचा डाव राहिला असल्याची टीकाही तयांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe