Farmer Success Story:- शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बिनभरवशाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कारण आपण पाहतो की कित्येकदा हातात आलेली पिक नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जातात व शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया देखील पडत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज देखील तरुण शेतीकडे वळताना आपल्याला दिसून येत नाहीत.
परंतु आता कालांतराने या परिस्थितीमध्ये बदल होताना दिसून येत आहे. कारण नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आता शेतीकडे वळत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व्यवसाय दृष्टिकोनातून केली जात आहे. हा झाला या शेतीच्या विषयी पहिला मुद्दा.

यामध्ये दुसरी बाजू जर पाहिली नोकरी नसल्यामुळे शेतीकडे वळणारे तरुण वेगळे आणि हातात पन्नास हजार रुपये पगार असलेली नोकरी सोडून शेतीत येणारे काही शेतकरी देखील आपल्याला दिसून येतील. हातात असलेली एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून शेतीत येणे म्हणजे हे खूप जोखीमीचे काम आहे.
परंतु तरीदेखील काही शेतकऱ्यांनी हे धाडस केले व शेतीत येऊन नोकरीपेक्षा काही पटीने पैसा मिळवण्यात यशस्वी झाले. अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार असून या शेतकऱ्याने देखील 50 हजार रुपयांची पगाराची नोकरी सोडली व आज यशस्वी शेती सुरू केली आहे.
शेतीतून कमवत आहे वार्षिक 50 लाख रुपयांचा नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हरियाणातील कर्नाल या जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरेंद्र सिंह चौहान एका खाजगी कंपनीमध्ये प्रति महिना 50 हजार रुपये पगारावर नोकरी करीत होते. परंतु त्यांनी या नोकरीला रामराम ठोकला व 14 एकर बागायती शेती करायला सुरुवात केली.
एवढेच नाही तर आज या शेतीच्या माध्यमातून नरेंद्र सिंह हे वार्षिक 50 लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. जर आपण त्यांच्या त्या पन्नास हजार रुपये नोकरीचा विचार केला तर एका वर्षाला साधारणपणे सहा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले असते. परंतु नोकरी सोडून शेती करून वर्षाला त्यांनी त्यापेक्षा दहा पट म्हणजेच 50 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे.
नरेंद्र सिंह यांचा कौटुंबिक व्यवसाय हा शेती असून त्यांनी पदव्युत्तर पदवी पर्यंत शेतीचे शिक्षण घेतले आणि एमएसडब्ल्यू केल्यानंतर चंदीगड या ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली. परंतु काही कालावधीनंतर मित्राच्या या सांगण्यावरून शेती व्यवसायात उतरायचे ठरवले.
परंतु शेतीमध्ये काय करावे किंवा कसल्या पिकांची लागवड करावी याचा विचार सुरू असताना नर्सरी म्हणजेच रोपवाटिका सुरू करण्याचे ठरवले व त्याकरिता लागणारा आवश्यक परवाना करिता अर्ज केला. परवाना मिळाल्यानंतर मात्र फळबाग रोपवाटिकाचा व्यवसाय सुरू केला व साधारणपणे ही घटना 1990 सालची असून त्यावेळी त्यांनी लवली नर्सरी राणा नावाने नर्सरी सुरू केली.
या नर्सरी व्यतिरिक्त 1995 मध्ये अखनुर सारख्या उष्ण भागातून बदाम आणले व त्यांची शेतात लागवडीला सुरुवात केली. बदामाव्यतिरिक्त 2016 मध्ये सफरचंदाची लागवड देखील केली व ती देखील यशस्वी केली. विशेष म्हणजे नरेंद्र सिंह यांनी लागवड केलेल्या सफरचंदाला राणा गोल्ड एप्पल असे नाव दिले आहे.
आज त्यांच्या या शेतामध्ये सफरचंद, बदाम, बटाटा तसेच आंबा अशा इतर सर्व फळबागांची लागवड केली आहे. आज विविध प्रकारच्या सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्यांनी यामध्ये अनुदान देखील मोठ्या प्रमाणावर मिळवले आहे. त्यांच्या शेतामध्ये टिकणारे फळांचे उत्पादन खरेदी करण्यासाठी व्यापारी शेतात येतात असे देखील त्यांनी सांगितले.
एवढेच नाही तर फळबागांसोबतच त्यांनी कोबी आणि टोमॅटो सारख्या भाजीपाल्याचे उत्पादन देखील घेण्यामध्ये यश मिळवले आहे. अशाप्रकारे विविध फळबाग आणि भाजीपाला पिकांच्या माध्यमातून ते वर्षाला 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
नरेंद्र सिंह चौहान यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की शेतीमध्ये जर विविध तंत्रज्ञान आणि फळबागांची लागवड केली योग्य व्यवस्थापन ठेवले तर शेतीमधून आपण लाखो रुपये कमवू शकतो हे सिद्ध होते.