इतिहासाच्या पानांमध्ये काही राजे आपल्या शौर्यामुळे, तर काही आपल्या शहाणपणामुळे अजरामर झाले. मात्र काही राजे असे होते ज्यांचे नाव घेताच मानवी क्रौर्याची सीमा आठवते. या शासकांनी सत्ता टिकवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी इतकी अमानुष कृत्ये केली, की त्यांच्या कारकिर्दीचा उल्लेख आजही अंगावर शहारे आणतो. लोकांचा मृत्यू त्यांच्या दृष्टीने विजयाचा उत्सव असायचा. आज आपण अशाच काही क्रूर शासकांच्या कहाण्या पाहणार आहोत, ज्यांनी लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले.
अतिला द हन (Attila the Hun)

हुन साम्राज्याचा नेता अतिला द हन (Attila the Hun) याच्या नावानेच युरोपात भीतीचे वातावरण असायचं. इ.स. 434 ते 453 दरम्यान त्याने जेव्हा जेव्हा हल्ला केला, तेव्हा रक्ताच्या नदी वाहिल्या. अटिलाने अनेक लढायांमध्ये निर्दयपणे हजारो लोकांना ठार मारले. त्याच्या सामर्थ्याची इतकी दहशत होती की रोम साम्राज्यालाही त्याने हादरवून टाकले होते.
चंगेज खान
मंगोल साम्राज्याचा संस्थापक चंगेज खानही अशाच क्रूरतेचा भयानक चेहरा होता. त्याने केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर विरोधकांवर भीती बसवण्यासाठी लाखो लोकांना ठार केले. इतिहासकारांच्या मते, चंगेज खानच्या मोहिमांमध्ये तब्बल 4 कोटी लोकांचा बळी गेला होता. त्याच्या युद्धनीतीमध्ये सहानुभूतीला अजिबात वाव नव्हता.
तैमूर लंग
तैमूर लंग, ज्याला युद्धांत कत्तलीसाठी आणि डोक्यांच्या पिरॅमिड्स उभारण्यासाठी ओळखलं जातं, याने आपल्या स्वार्थासाठी सुमारे 1.7 कोटी लोकांचे प्राण घेतले. त्याची लढाई ही कधीही केवळ भूमीसाठी नसायची ती संपूर्ण शहरं उद्ध्वस्त करण्यासाठी आणि इतरांवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी असायची.
अलाउद्दीन खिलजी
भारतीय उपखंडही अशा क्रूरतेपासून सुटला नव्हता. दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला अलाउद्दीन खिलजी, इ.स. 1296 ते 1316 या काळात, आपल्या कठोर नियमांसाठी ओळखला गेला. किरकोळ गुन्ह्यांसाठीही तो लोकांना कठोर शिक्षा देत असे. त्याची सैनिकी मोहिमा अनेक वेळा संपूर्ण गावांच्या कत्तलीने भरलेली होती.
मुघल सम्राट औरंगजेब
मुघल सम्राट औरंगजेब, ज्याने सत्तेसाठी आपल्या भावांची हत्या केली आणि स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकले, यालाही आपण विसरू शकत नाही. इ.स. 1658 ते 1707 या काळात त्याने धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली हजारो लोकांवर अत्याचार केले. त्याच्या शत्रूंना दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षा आजही इतिहासाच्या काळ्या पानांवर कोरलेल्या आहेत.
मुराद चौथा
ऑटोमन साम्राज्याचा मुराद चौथा याचं उदाहरण तर आणखी धक्कादायक होतं. इस्लामिक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्याने कॉफी पिणाऱ्या लोकांनाही मृत्युदंड दिला. त्याच्या कारकिर्दीत न्यायसंस्थेऐवजी तलवार हवी तिथे चालायची. तो स्वतः गुन्हेगारांची मान उडवायचा.