पुरीधामच्या पवित्र भूमीवर दरवर्षी निघणारी जगन्नाथ रथयात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर संपूर्ण भक्ती, अध्यात्म आणि रहस्यांनी भरलेली एक अद्वितीय परंपरा आहे. यंदा 2025 मध्ये ही भव्य यात्रा 27 जूनपासून सुरू होणार आहे आणि पुरी शहरात श्रद्धेचा महासागर उसळणार आहे. जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा या तिघांच्या रथांच्या दर्शनासाठी, त्यांना हात लावण्यासाठी, रथाच्या दोरीला स्पर्श करण्यासाठी लाखो भक्त देश-विदेशातून पुरीकडे येणार आहेत.

रथयात्रेचा प्रारंभ होतो आषाढ शुक्ल द्वितीयेपासून, ज्यावर या यात्रेच्या अनेक धार्मिक परंपरा आधारलेल्या आहेत. या दिवशी भगवान जगन्नाथ आपल्या मंदिरातून बाहेर येऊन गुंडीचा मंदिरात जातात. त्या प्रवासाला ‘रथयात्रा’ म्हटले जाते. या यात्रेला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 26 जूनला ‘गुंडीचा मार्जना’ विधी होतो. म्हणजे भक्तगण आणि सेवक मिळून गुंडीचा मंदिराची सफाई करतात, ते स्थान सजवतात जिथे देव स्वतः काही दिवस वास्तव्यास येतात.
यात्रेचे वेळापत्रक
यात्रेचे वेळापत्रकही भक्तांसाठी विशेष आकर्षण असते. 1 जुलैला ‘हेरा पंचमी’ साजरी होते, जी देवी लक्ष्मीच्या नाराजीची कथा सांगते. 4 जुलैला ‘बहुदा यात्रा’ म्हणजे देव पुन्हा मंदिरात परततात. 5 जुलैला ‘सुन बेषा’ मध्ये भगवान सुवर्ण अलंकारांनी सजतात, आणि त्याच दिवशी ‘नीलाद्री विजय’ विधीने त्यांचे पुन्हा मूळ स्थानात आगमन होते.
या रथयात्रेपेक्षा अधिक गूढ आणि आकर्षक गोष्ट म्हणजे जगन्नाथ मंदिरातील मूर्तींचे रहस्य. दर 12 वर्षांनी ‘नवकलेवर’ विधीनुसार तिन्ही देवतांच्या लाकडी मूर्ती बदलल्या जातात. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया अधिक मासात होते आणि त्यादरम्यान संपूर्ण पुरी शहर अंधारात असते. वीज पूर्णपणे बंद केली जाते आणि मूर्ती बदलण्याच्या गुप्त विधीमध्ये फक्त निवडक पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जातो. या नवीन मूर्तींमध्ये ‘ब्रह्म तत्व’म्हणजे देवतांचे जीवतत्त्व गुप्तपणे स्थानांतरित केले जाते.
अचानक थांबतो समुद्राच्या लाटांचा आवाज
मंदिरात प्रवेश करताना भक्तांना एक अजून एक अद्भुत अनुभव येतो. सिंहद्वारातून आत प्रवेश करताना समुद्राच्या लाटांचा आवाज अचानक थांबतो. हे रहस्य आजवर विज्ञानानेही उकलू शकलेले नाही. शिवाय, मंदिराच्या परिसरात येताना जो चिता वास काही अंतरापर्यंत जाणवतो, तोही सिंहद्वारात प्रवेश केल्यानंतर क्षणात नाहीसा होतो.
जगन्नाथ रथयात्रा ही एक अशी अध्यात्मिक यात्रा आहे जी केवळ भाविकांच्या आस्थेचे प्रतीक नाही, तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय परंपरेचे सजीव रूप आहे.