भारताच्या इतिहासात अनेक योद्धा आणि राणींनी पराक्रमाचे शिखर गाठले, परंतु काही कथा अशा असतात ज्या काळाच्या आड हरवून जातात. अशाच विस्मरणात गेलेल्या पण गर्वाने मिरवाव्यात अशा एका राणीची कहाणी म्हणजे राणी नायकी देवी. हीच ती वीरांगना आहे जिने जगातील सर्वात क्रूर आणि धाडसी आक्रमकांपैकी एक असलेल्या मोहम्मद घोरीला युद्धभूमीवर पराभूत करून भारताच्या भूमीवरून कायमचा हुसकावून लावलं.
कोण आहे नायकी देवी?

नायकी देवी या चालुक्य घराण्यात जन्मलेल्या एक पराक्रमी राणी होत्या. त्यांचा जन्म गोव्यात झाला आणि लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि तलवार चालवण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्या अंगी असलेलं हे युद्धकौशल्य पुढे इतिहासाला एक नवीन वळण देणार होतं. त्यांचा विवाह गुजरातचे राजा अजयपाल सोलंकी यांच्याशी झाला होता. मात्र नियतीने घात केला. 1176 मध्ये अजयपाल यांची हत्या झाली आणि राज्यावर मोठं संकट कोसळलं. त्या वेळी त्यांचा मुलगा मूलराज अजून लहान होता. अशा परिस्थितीत राणी नायकी देवीने राज्याची सूत्रे हाती घेतली आणि खऱ्या अर्थाने एका राजमाता आणि सेनानायिका या दोन्ही जबाबदाऱ्या पेलल्या.
मुस्लिम आक्रमकांनी त्या काळात भारतावर सातत्याने हल्ले चढवले होते. याच दरम्यान मोहम्मद घोरी, जो गझनीचा एक बलाढ्य सेनापती होता, त्याने गुजरातकडे लक्ष वळवलं. त्याने आधी मुलतान जिंकलं होतं आणि आता त्याची नजर चालुक्यांची राजधानी अनहिलवाड पाटणवर होती. त्याला वाटलं की एका विधवा राणीच्या राज्यात शिरकाव करणं सोपं जाईल. पण तो राणीच्या धैर्याचा अंदाज लावण्यात अपयशी ठरला.
गदरघट्टावरील युद्ध
राणीने त्याच्या हल्ल्याची बातमी मिळताच तयारी सुरू केली. मदतीसाठी तिने आसपासच्या राजांकडे पाठवलेले संदेश निष्फळ ठरले. कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. मात्र नायकी देवी डगमगल्या नाहीत. त्यांनी स्वतः युद्धभूमी निवडली गदरघट्टा, जे माउंट अबूच्या पायथ्याशी होतं. हे ठिकाण रणनीतीदृष्ट्या अनुकूल होतं. मोहम्मद घोरीने गदरघट्टाला छावणी ठोकली आणि राणीला धमकीचा संदेश पाठवला आपले राज्य, आपले अपत्य, आणि स्वतः ला त्याच्या स्वाधीन करा, अन्यथा संहार अटळ आहे.
राणीने हुशारीने त्याच्याच सैन्यात 200 वेषांतरधारी सैनिक पाठवले. बाहेरून इतर सैन्य सज्ज ठेवले. स्वतःने आपल्या मुलाला पाठीवर बांधले आणि घोड्यावर स्वार होऊन युद्धभूमी गाठली. तिचे घोडेस्वार, पायदळ, आणि हत्तीवरचे सैनिक घोरीच्या छावणीवर वीजसारखे कोसळले. मोहम्मद घोरी अचंबित झाला. इतक्या जबरदस्त आणि संयोजित प्रतिकाराची त्याला कल्पनाही नव्हती. काही समजण्याच्या आत त्याच्या छावणीत हाहाकार माजला. नायकी देवीने इतका जोरदार हल्ला केला की घोरीला आपला जीव वाचवण्यासाठी युद्धभूमी सोडून पळ काढावा लागला.
या पराभवानंतर मोहम्मद घोरीने कधीच गुजरातकडे वळून पाहिलं नाही. नायकी देवीच्या शौर्याने ना फक्त गुजरात वाचवलं, तर भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहून ठेवलं. आज आपण अनेक परकीय आक्रमकांची नावं लक्षात ठेवतो, पण अशा वीरांगनांची गाथा विसरतो ज्यांनी वास्तवात भारतमातेला वाचवण्यासाठी तलवार उपसली.