काही गोष्टी अशी एक विलक्षण अनुभूती देतात की त्यांच्याशी संबंधित कथा ऐकल्या की मनात एक वेगळीच श्रद्धा आणि कुतूहल निर्माण होतं. भारतात अशाच काही जागा आहेत, जिथं विज्ञान थांबतं आणि विश्वास सुरू होतो. अशा जागांपैकी काही मंदिरे आजही हजारो लोकांसाठी एक गूढ आहेत. विशेष म्हणजे या मंदिरांबाबत अशी लोककथा सांगितली जाते की ती एकाच रात्रीत उभारली गेली होती. ही गोष्ट केवळ ऐकण्यासच नव्हे तर वास्तविकतेच्या कसोटीवरही अचंबित करणारी ठरते.

गोविंद देव जी मंदिर
वृंदावनमधील गोविंद देव जी मंदिर यापैकी एक अद्वितीय उदाहरण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर राक्षस आणि देवांनी मिळून उभारण्याचा प्रयत्न केला होता. भगवान विष्णूच्या सन्मानार्थ हे बांधले जात होते, पण सूर्योदय झाल्याने त्यांचं काम अपूर्ण राहिलं. म्हणूनच आजही हे मंदिर पाहताना त्याची अर्धवट रचना एक प्राचीन रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी वाटते.
देवघरमधील शिवमंदिर
झारखंडच्या देवघरमध्ये असलेलं शिवमंदिरही एक रात्रात उभारले गेल्याचं सांगितलं जातं. रावणाने भगवान शंकराला लंकेत घेऊन जाण्याचा निश्चय केला होता. मात्र, त्यांनी शिवलिंग जमिनीवर ठेवले आणि तेथून ते हलवणं अशक्य झालं. त्यानंतर विश्वकर्म्याने रात्रीतून तिथं एक सुंदर मंदिर उभारल्याचं मानलं जातं. या कथेमुळे देवघर हे केवळ तीर्थस्थळ न राहता, एका अद्भुत चमत्काराचं प्रतीक बनून गेलं आहे.
काकणमठ मंदिर
मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्याजवळचं काकणमठ मंदिर आणखी एक विलक्षण रचना आहे. हे मंदिर इतकं जुळून बांधलेलं आहे की दगडांना ना सिमेंट आहे ना कोणतंही जोडणारं साधन. तरीही शेकडो वर्षांपासून हे मंदिर उभं आहे. काही स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर भोलेनाथच्या गणांनी, म्हणजे भूतांनी एका रात्रीत बांधलं. त्यामुळेच आजही ते मंदिर पाहणाऱ्याच्या मनात भीती आणि श्रद्धा दोन्ही जागवते.
हातिया देवली मंदिर
उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील हातिया देवली मंदिराचं नाव ऐकणाऱ्यांमध्ये एक वेगळीच जिज्ञासा निर्माण होते. सांगितलं जातं की एका कुशल कारागिराने एका हाताने हे मंदिर एका रात्रीत बांधलं होतं. पण गडबडीत शिवलिंगाचा अर्घ चुकीच्या दिशेने बसवला गेला. त्यामुळे आजही या मंदिरात पूजा केली जात नाही. तरीही स्थानिकांच्या श्रद्धेमुळे मंदिराचं महत्त्व अबाधित आहे.
भोजेश्वर मंदिर
या साखळीत शेवटचं मंदिर म्हणजे भोजेश्वर मंदिर, जे मध्य प्रदेशातील भोजपूर गावात आहे. भगवान शिवाला समर्पित या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेलं एक विशाल शिवलिंग, जे एका दगडातून तयार करण्यात आलं आहे. इतिहासकारांचा अंदाज आहे की परमार वंशातील राजा भोज यांनी याची निर्मिती केली होती. ते मंदिर रात्रीत पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सूर्योदयामुळे काम अपूर्ण राहिलं. आजही ते मंदिर त्याच्या अर्धवट पण राजस रचनेमुळे इतिहासाचा एक जिवंत अध्याय बनलं आहे.