पावसाची पहिली सर कोसळली की मन एकदम निळंशार आभाळात हरवून जातं, आणि त्याच वेळी सुट्टीचा विचारही मनात येतो. भारतात काही निवडक ठिकाणं आहेत, जी पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गासारखी भासतात. गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत ही ठिकाणं तुम्हाला नव्या ऊर्जा आणि आनंदाने भरून टाकतील. पावसाळ्यातील पर्यटनासाठीचे बेस्ट ठिकाणं आपण या लेखात पाहणार आहोत.
मेघालयातील शिलाँग

उत्तरपूर्व भारतातलं सौंदर्य नेहमीच थक्क करणारं असतं. मेघालयातील शिलाँग हे तसंच एक ठिकाण, जे पावसाळ्यात आपलं खरं रूप दाखवतं. “पूर्वेचं स्कॉटलंड” म्हणून ओळखलं जाणारं शिलाँग, धबधबे, डोंगररांग आणि पावसाच्या सरींनी एक सुंदर दृश्य तयार करतं. इथे पावसात भटकण्याचं वेगळंच समाधान मिळतं, आणि त्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये हरवून जाण्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो.
लोणावळा आणि खंडाळा
महाराष्ट्रातील लोणावळा आणि खंडाळा हे दोन हिल स्टेशन पावसाळ्यात एक वेगळाच जादूई अनुभव देतात. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असूनही इथं मिळणारी शांतता आणि निसर्गसौंदर्य अपार आहे. पावसात धुक्याची चादर डोंगरांवर पसरते, धबधब्यांचे आवाज कानात रेंगाळतात, आणि ट्रेकिंगप्रेमींसाठी तर ही स्वर्गसमान ठिकाणं आहेत. पावसाच्या गंधात भिजलेली ही मोकळी माती आणि थंड हवा तुम्हाला नव्याने जगायला शिकवते.
केरळ
दक्षिण भारतातलं केरळ हे राज्य निसर्गरम्यतेसाठी ओळखलं जातं, आणि त्यातलंच एक खास ठिकाण म्हणजे अॅलेप्पी. ‘केरळचं व्हेनिस’ असं ज्याला म्हणतात, ते अॅलेप्पी पावसाळ्यात आणखीनच सुंदर होतं. बॅकवॉटरमध्ये हाऊसबोटवर बसून येथील हिरवळ पाहताना वेळ कसा जातो हे कळतही नाही.
कुर्ग
कोडागू, ज्याला आपण कुर्ग म्हणून ओळखतो, हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींनी एकदा तरी भेट द्यावं असं स्वप्नवत गाव आहे. पावसाळ्यात कुर्गच्या डोंगराळ भागात धुके पसरलेलं असतं, आणि ते वातावरण इतकं मंत्रमुग्ध करणारं असतं की काही क्षणासाठी तरी सगळ्या चिंता दूर जातात. इथल्या कॉफीच्या वासात, शांत हवेच्या गारव्यात आणि निसर्गाच्या कुशीत हरवणं, हीच खरी सुट्टी असते.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे नाव जसं आलंय, तसं ते ठिकाण खरंच फुलांनी भरलेलं स्वर्ग वाटतं. UNESCO चं वर्ल्ड हेरिटेज साईट असलेली ही जागा जुलै ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये रंगीबेरंगी फुलांनी भरते. येथे ट्रेकिंग करताना डोंगरमाथ्यावरून दिसणारी फुलांची ही दरी मनावर निसर्गाची मोहिनी घालते.
चेरापुंजी
अखेर, चेरापुंजी भारतातल्या सर्वाधिक पावसाळी ठिकाणांपैकी एक. इथं पाऊस म्हणजे केवळ हवामान नाही, तो एक सण असतो. धबधब्यांचे नजारे, गुहांची रहस्यं, आणि सर्वांत विशेष म्हणजे येथील ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ म्हणजेच जिवंत झाडांच्या मुळांनी तयार झालेले पूल हे सर्व पाहताना आपण निसर्गाशी नव्याने जुळतो.