सहारनपूरच्या आंब्याला ‘लंगडा’ असं नाव कधी आणि का पडलं?, वाचा त्यामागची ऐतिहासिक कहाणी!

Published on -

सुगंधाने भारलेला, चवीनं मन मोहवणारा आणि पोतानं अगदी वेगळा… असा हा “लंगडा आंबा”! तुम्ही कधी विचार केला आहे का, की असा चविष्ट आणि सुंदर आंबा ‘लंगडा’ या नावाने का ओळखला जातो? नाव जरा विचित्र वाटतं, पण त्यामागची कहाणी ऐकली की तुमचं मनही भारावून जाईल. ही गोष्ट आहे इतिहासातील त्या एका साध्या, पण विलक्षण माणसाची, ज्याच्या हातून या आंब्याची सुरुवात झाली आणि ज्याच्या नावाने हा आंबा अख्ख्या देशात ओळखला जाऊ लागला.

अपंग पूजाऱ्याची कथा

कथेनुसार, उत्तर भारतातील बनारस म्हणजेच सध्याच्या वाराणसीमधील एका मंदिरात एक अपंग पुजारी राहत होता. त्याच्या पायात त्रास होता म्हणून गावकरी त्याला ‘लंगडा पुजारी’ म्हणत. हाच तो माणूस, ज्याने आपल्या आश्रमाच्या आवारात एक विशेष आंब्याचं झाड लावलं. हे झाड काही वर्षांत इतकं बहरलं की त्याच्या आंब्यांनी संपूर्ण परिसर सुगंधित झाला. लोकांनी एकदा हे आंबे चाखले आणि मग त्याच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.

मात्र या आंब्यांना जपणं काही सोपं नव्हतं. परिसरातील मुलं झाडावर दगड मारून आंबे तोडत असत, तेव्हा लंगडा पुजारी आपल्या काठीच्या मदतीने त्यांना दूर हाकलून आंबे वाचवत असे. त्याचं हे प्रेम आणि जपणूक लोकांच्या नजरेत आलं आणि हळूहळू या झाडालाच ‘लंगडा का आम’ म्हणायला सुरुवात झाली.

…असं पडलं ‘लंगडा आंबा’ नाव

गावकऱ्यांनी ही गोष्ट थेट त्या काळातील राजापर्यंत पोहोचवली. राजाने आंबे मागवून चाखले आणि त्याच्या अनोख्या चवीनं इतका भारावला की त्याने त्या आंब्याचं नाव ‘लंगडा आम/आंबा’ असंच ठेवण्याचा आदेश दिला. आज हे झाड नाही, पण त्याच्यापासून वाढलेली झाडं आणि त्या पुजाऱ्याचं स्मरण, प्रत्येक लंगडा आंब्याच्या घमघमाटात आजही जिवंत आहे.

सहारनपूरसारख्या उत्तर प्रदेशमधील भागात हे आंबे मोठ्या प्रमाणावर लागवडीत येतात. या भागाला ‘आंबा पट्टा’ असंही म्हणतात. इथून दरवर्षी हजारो टन लंगडा आंबे मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपासून ते थेट परदेशातही जातात. याची खासियत अशी की पूर्णपणे पिकल्यावरही हा आंबा हिरवाच राहतो, जे इतर आंब्यांच्या बाबतीत फार कमी होतं. त्याची घट्ट चव, सुगंध आणि कमी आंबटपणा यामुळे तो घराघरांत आवडीने खाल्ला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!