पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेचा सोहळा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभूतीने भरलेला एक अनुपम उत्सव आहे. आषाढ महिन्यात काढली जाणारी ही यात्रा लाखो भाविकांना ओडिशाच्या पुरी नगरीकडे खेचून नेते.

2025 मध्ये ही यात्रा 27 जून रोजी होणार असून, जगभरातून भाविक पुरीकडे मार्गस्थ होणार आहेत. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा हे तिन्ही देव भक्तांच्या नजरेसमोर आले की, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात, तो क्षण एक वेगळाच अध्यात्मिक आनंद देतो.
या यात्रेचा एक विशेष भाग म्हणजे भक्तांनी मंदिरातून परतताना काही विशिष्ट गोष्टी आपल्या सोबत घेऊन याव्यात, जेणेकरून त्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील. हजारो वर्षांची परंपरा आणि भक्तांची श्रद्धा यामुळे या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं.
छडी
पहिली गोष्ट म्हणजे छडी. पुरीच्या मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वांना एक विशिष्ट छडीने हलकासा मार दिला जातो. यामागे धार्मिक विश्वास असा की ही छडी म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. या आशीर्वादामुळे जीवनातील गरिबी, अडचणी आणि नकारात्मकता दूर होते. म्हणूनच, जेव्हा भाविक पुरीहून परततात, तेव्हा ते ही छडी आपल्या घरी घेऊन येतात. घरात ती ठेवली की धन, ऐश्वर्य आणि सौख्य वाढतं, असा लोकांचा विश्वास आहे.
निर्माल्य (देवाला अर्पण केलेला तांदूळ)
दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माल्य – म्हणजे देवाला अर्पण केलेला विशेष तांदूळ. हा तांदूळ शिजवून, उन्हात वाळवून, पुन्हा देवतेला अर्पण केला जातो. त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून तो भक्तांना दिला जातो. या निर्माल्याचा घरात सन्मानाने ठेव केल्यास घरात अन्नधान्याची आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही, असे मानले जाते. अनेकजण या तांदळाचा थोडा भाग घरातल्या पूजा स्थळी ठेवतात, काहीजण तो भात शिजवून प्रसाद म्हणून ग्रहण करतात.