पावसाळा जवळ आला की हवामान खात्याचे अपडेट्स, मोबाईल अॅप्स आणि शास्त्रीय उपकरणे यांच्याकडे आपले लक्ष जातं. मात्र, विज्ञानाची साधने न वापरताही अनेक ग्रामीण भागांमध्ये लोक वर्षानुवर्षांपासून निसर्गावर आधारित पद्धतींनी हवामानाचा अचूक अंदाज घेत आले आहेत. यामध्ये एका पक्ष्याचं निरीक्षण नेहमी केलं जातं, हा पक्षी म्हणजे ‘कावळा’

कावळ्याचे घरटे सांगते हवामान अंदाज-
पर्यावरण अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, गावकरी कावळ्यांच्या घरट्याकडे पाहून वादळ किंवा मुसळधार पावसाचा अंदाज लावत आले आहेत. जर कावळ्याने झाडाच्या मजबूत, जाड फांदीवर घरटे बांधले, तर तो काळ वादळाचा असतो. कारण कावळा आपल्या अंड्यांना आणि पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सशक्त स्थळ निवडतो. म्हणजेच जिथे जोराचा पाऊस किंवा वारा अपेक्षित असतो, तिथेच तो अधिक मजबूत फांदी निवडतो.
याउलट, जर हवामान सौम्य राहणार असेल, तर कावळा पातळ फांद्यांवरही घरटे बांधतो. गावकरी यावरून हवामान कसे असेल हे ठरवतात. एवढंच नव्हे, तर कावळा घरट्याची उंची, त्याची दिशा आणि फांदीची ताकद यावरूनही भविष्यातील वातावरणाची माहिती देतो.
‘या’ गावात आजही ही परंपरा सुरू
कावळ्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची संवेदनशीलता इतकी प्रखर आहे की, ते आर्द्रता वाढल्यावर, वाऱ्याची दिशा बदलली किंवा तापमान कमी-जास्त झाले की तात्काळ प्रतिक्रिया देतात. काही वेळा ते आपले घरटे दुरुस्त करतात किंवा अन्न लपवतात. कावळ्याची ही क्रिया हवामान बदलाचं संकेत देतात.
खरगोनच्या भिकनगाव, झिरण्या आणि कसरावाड या गावांमध्ये ही परंपरा आजही चालू आहे. स्थानिक लोक रोज सकाळी झाडांकडे नजर टाकतात आणि कावळ्याचं घरटं कुठं आहे, किती उंचीवर आहे, त्याने कुठल्या दिशेने ते बांधले आहे यावरून पाऊस केव्हा आणि किती होणार हे ठरवतात.